Friday, May 14, 2010

पारतंत्र्य

स्थळ:पाणीपुरीची एक टपरी.
एक सुखवस्तू कुटुंब पाणीपुरी खात होतं. आई-बाबा आणि दोन पाच ते दहा वर्षांची मुलं. बाबा त्या पाणीपुरी विकणाऱ्या माणसाला मध्येच म्हणाले "ए ,ह्यात पाणी घाल रे जरा अजून". वाक्य तसं साधंच पण म्हणायची पद्धत किंवा tone साधा नव्हता. त्यात त्या विकणाऱ्याबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलचा माज ठासून भरलेला होता.

आपण चांगल्या खात्यापित्या घरातले, कुठेतरी white collar नोकरी नाहीतर व्यवसाय करणारे म्हणून हातगाडीवर काहीतरी विकणाऱ्यापेक्षा किंवा हॉटेल मधल्या वेटरपेक्षा वरचढ आहोत आणि त्यांच्याशी कसंही बोलू शकतो,असं का वाटतं ? साधी गोष्ट आहे,ज्याची आपली ओळख नाही अशा माणसाशी बोलताना आपण अहो-जाहो वापरतो किंवा अरे-तुरे केलं तरी त्यात तुच्छता नसते. हे जर एरवी आपण करू शकतो तर वॉचमन ,हातगाडीवाले, वेटर , मोलकरणी यात अपवाद का? मग आपलं काम केल्याबद्दल त्यांना thank you म्हणणं तर सोडाच. एखादा माणूस योग्य मार्गाने कष्ट करून स्वतःचं पोट भरत असेल तर किमान अपेक्षित असणारा आदर देखील त्याला द्यायचा का नाही हे तो white collar काम करतो का blue collar यावर का ठरतं ?

एकूणच आपण भारतीय लोक शारीरीक श्रमांना फारशी किंमत देत नाही यात काही नवीन नाही. the interesting question is "why" are we like this? मुळात शेतीप्रधान देश, सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याचा इतिहास ,त्याला पूरक अशी प्राचीन समाजव्यवस्था असं सगळं असतानाही ही शारीरीक कष्टांना कमी लेखण्याची वृत्ती आली कोठून? एक शक्यता वाटते...दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केल्यानंतर आणि त्याच्याही आधी वेगवेगळ्या परकीय आक्रमणांचा अनुभव घेतल्यानंतर जो प्रगत तो वरचढ हे तत्त्व आपल्या लक्षात आलंच असणार. त्यांनी जशी आपल्यावर सत्ता गाजवली तशी आपण आपल्याच देशातल्या कमी प्रगत लोकांवर गाजवायची हे इतक्या वर्षांत आलेल्या न्यूनगंडातून रुजलं असावं. मग ज्याच्याकडे जास्त पैसा,शिक्षण,सोयी-सुविधा किंवा हे सगळं आहे तोच प्रगत आणि म्हणून वरचढ. त्यातूनच अशा so called वरचढ लोकांमध्ये आलेली इतरांबद्दलची तुच्छतेची भावना.

एखाद्या राजवटीचे फक्त राजकीयच नव्हे तर समाजाच्या मानसिकतेवर देखील किती खोलवर परिणाम होऊ शकतात.

p.s - discussion with siddhya