Tuesday, April 13, 2010

विहीर

तसं पहायला गेलं तर 'विहीर' या चित्रपटामध्ये नचिकेतचा मृत्यू सोडून रुढार्थाने काहीच घडत नाही.बाकी सगळा चित्रपट नचिकेतचा जवळचा मावसभाऊ समीरवर या मृत्यूचा काय परिणाम होतो याभोवती फिरतो.

नचिकेतच्या अचानक जाण्याने सैरभैर झालेल्या समीरच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे.पण त्याच्या आजूबाजूची माणसं, घटना पूर्वीसारख्याच आहेत. बाहेरून तोही शक्य तेवढा भोवतालच्या जगाशी सुसंगत वागायचा प्रयत्न करतोय.पण एकीकडे सतत तो घडलेल्या गोष्टीचा ,नचिकेतच्या आधीच्या बोलण्याचा विचार करतोय, त्याला वेगवेगळे प्रश्न पडतायत.

त्याचं शाळेत जाणं, पोहायला जाणं ,अस्वस्थ होऊन घरातून निघून जाणं... या सगळ्या घटना दाखवताना विविध चौकटींचा,दृश्यांचा वापर होतो.मध्येच एक बाई पाणी भरताना दिसते ,एक माणूस घोड्यावरून जाताना दिसतो , बिल्डिंग मधली भांडणं ... वरवर पहाता या सगळ्या चौकटी किंवा दृश्ये संदर्भहीन आणि एकमेकांशी विसंगत वाटतात. पण त्याचा एकत्रित विचार केला तर सभोवतालच्या routine, एकसुरी वातावरणात राहूनही चाललेली समीरच्या मनातली घालमेल,त्याला बसलेला धक्का या गोष्टी अधोरेखित होतात. त्याची जी आतल्याआत उलथापालथ चालू आहे त्याचं बाहेरच्या कोणालाच काही देणंघेणं नाहीये.त्यांच्या ती लक्षातही येत नाहीये.स्वतः समीर तर या भोवतालच्या जगात असून नसल्यासारखा झालाय.

हे सगळं बघताना बरेच प्रेक्षक कंटाळतात (त्यात मी पण आले).कारण इतका वेळ चित्रपट बघूनही अजून काहीच 'घडत' नाहीये असं वाटतं.पण मुळात पडद्यावर दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्यात घडणाऱ्या घटना बघताना त्या केवळ बघूनच समजतात असं नाही तर कधीकधी अनुभवाव्या लागतात. आपल्याला मात्र त्यात काहीतरी निष्कर्ष निघायला हवा असतो.मग तो दिग्दर्शकाने तरी काढून द्यावा किंवा आपल्याला काढायला वाव ठेवावा.विहीर मध्ये नेमकं यातलं काहीच होत नाही.एखादं चित्र असावं तसा हा चित्रपट दिसतो.

कुठल्याही नाटकाच्या ,चित्रपटाच्या किंवा कलाकृतीच्या मागचा अगदी मूळ हेतू हा ती बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे किंवा भावनांचे सादरीकरण (presentation) अथवा प्रकटीकरण (expression) हा असतो. जेव्हा कलाकृतीमधून एखादा विचार मांडायचा असतो तेव्हा तो समजणं तेवढं कठीण जात नाही.कारण ते समजून घेणं जाणीवेच्या पातळीवर असतं.तुम्ही समोर घडणारी घटना बघता ,त्यावर विचार करता,तो दिग्दर्शकाच्या म्हणण्याशी पडताळून पहाता. पण जेव्हा एखाद्या भावनेचे बारकावे मांडले जातात तेव्हा ही प्रक्रिया ज़रा वेगळी होते. एकदम संवेदनशील कलाकृती बनवताना ती बनवणारा ज्या मनःस्थितीत असतो किंवा ज्या अनुभवातून गेलेला असतो त्याचा अंदाज बघणाऱ्याला येईलच असं नाही. ते समजून घेणं हे बघणाऱ्याच्या मानसिकतेवर, संवेदनशीलतेवर ,त्याने आजवर अनुभवलेल्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणूनच अशा कलाकृतीमधून रुढार्थाने काही 'takeaway' नसला तरी ती नेणिवा समृद्ध करणारा एक अनुभव देऊ शकते.

Monday, April 12, 2010

मोहे तोही लागी कैसे छूटे री

The Japanese Wife बघितला आणि एकदम आठवला तो 'बयो' . तेच निरपेक्ष प्रेम, एकमेकांसाठी जगाच्या अंतापर्यंत वाट बघायची तीच ती तगमग, एकाने दुसऱ्याचा घेतलेला अखंड ध्यास आणि दुर्दैवी अखेर.

एकीकडे उधाणलेला समुद्र आणि जीवघेणं सूफी संगीत तर दुसरीकडे पिसाळलेली 'मातली' नदी आणि वेडावाकडा कोसळणारा पाऊस.

लंडनला गेलेल्या विश्वनाथाचं उत्तर आलं नाही तरीही सतत पाच वर्षे चिकाटीने पत्र पाठवत रहाणारी बयो आणि केवळ पत्रांमधून एकमेकांना भेटलेले आणि लग्न करून सतरा वर्षे पत्रांमधूनच सहजीवन अनुभवलेले स्नेहमोय आणि मियागे.

पाच वर्षे विश्वनाथाच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर आणि पैसे साठवल्यानंतर थेट लंडनला जायला निघणारी कोकणातली बयो आणि जपानमधल्या मियागेला कॅन्सर झाला म्हणून तिच्या उपचारासाठी कलकत्त्यातल्या डॉक्टर आणि वैद्य लोकांचे उंबरठे झिजवणारा स्नेहमोय..

"तू कोकणातली मुलगी,लंडनला वगैरे जाण्याचं खूळ कशाला घेऊन बसलीयेस?" असं विचारल्यावर बयो "मग,पाच वर्षे झाली, विश्वनाथाचं काही उत्तर नाही,काय झालंय ,काही अड़चण आहे का,जाऊन बघायला नको?" असं अतिशय सहजतेने उत्तर देते.कुठेही विश्वनाथाने आपल्याला सोडलं तर नाही ना अशी शंका नाही, अविश्वास नाही. इतकं शुद्ध प्रेम बघून खरंतर अस्वस्थ व्हायला होतं. कॅन्सरवर जपानमधे भारतापेक्षा जास्त नीट उपचार होऊ शकतील हे माहीत असूनही ,परवडत नसताना कुठल्यातरी वैद्याने दिलेले काढ़े मियागेला पाठवणारया स्नेहमोयची जातकुळी नि:संदेह प्रेमाचीच .

बयो पाहिला तेव्हा प्रचंड आवडला होता.खूप intense सिनेमा आहे .मी परत नाही बघू शकणार.The Japanese Wife तसा विशेष आवडला नाही. पण कोणताही आव न आणता स्वतःच्या प्रेमावर गाढ़ विश्वास ठेवणारे ,मीपण ,पैसा ,प्रतिष्ठा ,कष्ट यांची पर्वा करण्याच्या पलिकडे गेलेले स्नेहमोय,मियागे आणि बयो यांचं कुठेतरी नातं आहे असं वाटत रहातं.