Friday, July 03, 2009

पाऊस आणि उगाच काहीतरी

सकाळपासून पाऊस लागलाय. काम करताना राहून राहून खिडकीबाहेर लक्ष जातंय. नजर हटत नाही इतका सुंदर पाऊस. घरी आल्यावर तर खिडकीशीच चिकटून बसलेय.भारतातला पाऊस छान असतो पण इथला पाऊस काही वेगळाच आहे. भारतातला पाऊस एकटा येत नाही. तो बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज अणि पावसाळी सहली घेऊन येतो. इथला पाऊस एकटाच येतो. लांबचलांब रिकामा रस्ता अणि त्यावर सावकाश पडणारा पाऊस पाहिलाय कधी? भारतातला पाऊस तुमच्या खोड्या काढतोय असं वाटतं. इथला पाऊस शांतपणे सोबत करतो. एखादा दिवस office ला जायला म्हणून निघावं आणि अशी मस्त हवा बघून मधेच उतरून इथल्या अप्रतिम नागमोडी रस्त्यांवरून ह्या पावसाबरोबर निरुद्देश भटकत रहावं.


खिडकीतून बाहेर बघताना एकदम हलकं हलकं वाटतंय. आत्ता इथे फक्त मी आणि सोबतीला पाऊस , बाकी सगळी व्यवधानं , सगळी नाती, त्यातल्या आशा, अपेक्षा ,चिंता,त्यातले गुंते काहीही माझ्यापर्यंत पोचतंच नाहीये. हा या पावसाच्या सोबतीचा परिणाम का एकटेपणाचा ? दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. हजारो मैल दूर असलेल्या जवळच्या माणसानी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून देणं जमतंय की आपल्याला. मग एरवी नात्यातल्या अपेक्षा , इच्छा , अपेक्षाभंग असल्या खो-खो मधे का रमतो आपण?

नाती इथल्या पावसासारखी का नसतात?